१८ मे २००८

तो तिसरा क्षण - आर यू ऍन इंडियन ?

(या आधीच्या 'ते दोन क्षण' ह्या लेखांमध्ये ज्या 'खास' क्षणांचा उल्लेख केला होता, त्याच माळेतला हा तिसरा क्षण)
संवाद १ -
"व्हेअर आर यू बेस्ड आऊट ऑफ"?
"आमचं मुख्य 'डेव्हलपमेंट सेंटर' भारतात आहे आणि ७ देशांत आमची कार्यालयं आहेत."
"ओह ! इंडिया... द लँड ऑफ इंटेलिजंट पीपल"
संवाद २ -
"आर यू ऍन इंडियन?"
"येस आय ऍम!"
"दॅटस ऑसम. मी आधी एका इंव्हेस्टमेंट बँकेसाठी काम करत होते. माझे काही सहकारी मुंबईत होते. त्यांच्याबरोबर काम करणं हा एक विलक्षण अनुभव होता. आय मीन दे वर सो ब्रिलियंट ! मला नेहेमी जाणवायचं की त्यांची पात्रता माझ्यापेक्षा कितीतरी जास्त आहे."
"थँक्स फॉर दॅट कॅरन !"
हे कपोलकल्पित संवाद नाहीत. जानेवारीत लंडन मध्ये झालेल्या एका कॉंफरन्स / एक्स्पो मध्ये आलेल्या अनेक अनुभवांपैकी दोन आहेत. मी गेली ३ वर्षं ह्या कॉंफरन्स ला माझ्या कंपनीचं प्रतिनिधित्त्व करतोय. ३ वर्षांपूर्वीचा एक संवाद अजून आठवतो.
"आर यू फ्रॉम पाकिस्तान... इंडिया ऑर समथिंग?" (कारण सगळ्या युरो - अमेरिकन कंपन्यांमध्ये दोनच भारतीय - खरं तर एशियन - कंपन्या होत्या. त्यामुळे आम्ही 'ब्राऊन' लगेच ओळखू येत होतो)
"येस"
"मग तुम्ही तुमची "स्वस्तात काम" करण्याची कंसेप्ट विकत आहात तर !"
असं त्या खडूस म्हाताऱ्यानी म्हटल्यावर माझ्या कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. पण आज चित्र खूप वेगळ होतं. 'लर्निंग टेक्नॉलॉजीज' मध्ये ६ भारतीय कंपन्या दिमाखात उभ्या होत्या. कंपनीचा स्टॉल लावतानाच माझ्या बॉस नि स्पष्ट सांगितलं होतं " कोणी भारतीय म्हणून काही वेडंवाकडं बोललं तर सरळ उलट उत्तर द्या. ऐकून घेऊ नका". आणि त्यानंतरचे दोन दिवस एका वेगळ्याच कैफात गेले. ब्रिटिश, अमेरिकन, फ्रेंच, जर्मन, स्वीडस, स्विस, डच, जॅपनीज, कोरियन... जगातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांशी बोलताना त्यांचा भारताबद्दलचा बद्दलचा बदललेला दृष्टिकोन चांगलाच जाणवत होता. टाटांची भरारी, नॅनो, (त्यावेळी होऊ घातलेली) जॅग्वार लँडरोव्हर ची डील, काँटिनेंटल होटेल्स चा उतरवलेला नक्षा, लक्ष्मी मित्तल, अंबानी बंधू, इंफी, विप्रो पासून ते सचिन, शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय, शाहरूख खान पर्यंत परदेशीयांना भारताबद्दल आता बरीच 'बरी' माहिती होती. म्हणजे ह्यांच्या लेखी भारत गारुड्यांच्या जमान्यातून अखेर बाहेर आला होता तर.
माझी खूप वर्षांपासून एक महत्त्वाकांक्षा आहे, एक स्वप्न आहे. मला कधी ना कधी, कुठे ना कुठे, कसंतरी करून भारताचं प्रतिनिधित्त्व करायचंय. माझ्यासाठी ही "जीव ओवाळून टाकावा" अशी गोष्ट आहे. गेली ३ वर्षं मी छोट्या प्रमाणावर का होईना, माझं स्वप्न जगतोय. ह्या वर्षी तर "नॉट एव्हरीवन कॅन अफोर्ड अस", "आफ्टर ऑल वी आर ऍन इंडियन कंपनी" असं बोलताना गर्वानी छाती फुगून जात होती. 'जॉब हंटिंग' साठी येणाऱ्या गोऱ्यांना "सेंड मी योर रेझ्यूमे" सांगताना वेगळाच आनंद होत होता. संयोजकांच्या पार्टीच्या वेळी गोऱ्यांच्या गर्दीत बुजणं तर दूरच, पणा आम्हाला आमच्या युरोपियन सहकाऱ्यांना ह्या वर्षाची योजना समजावून सांगताना बघून गोऱ्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. भारतीय म्हणून जगात आमची मान ताठ करणाऱ्या टाटा, नारायणमूर्ती, पचौरी, देवांग मेहता, विनोद खोसला, विनोद धाम, पेस - भूपती, फोर्स इंडिया चे विजय मल्ल्या पासून शिल्पा शेट्टीपर्यंत सगळ्यांबाबत मला अभिमान वाटतो. आणि त्यात माझ्या आयआयटी - आय आय एम मध्ये शिकलेल्या बॉस चे शब्द कानावर पडतात ....... "मला भारतीय असण्याचा अभिमान आहे.... आणि म्हणूनच मी ठरवलंय की मी फक्त भारतीय कंपनीसाठी काम करणार"...... माझा अभिमान द्विगुणित होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: