१९ फेब्रुवारी २००८

ते दोन क्षण - भाग १

पु. लं. च्या 'व्यक्ती आणि वल्ली' मध्ये 'दोन वस्ताद' नावाचा लेख आहे. त्यातल्या टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामांच्या आयुष्यात एकेक अविस्मरणीय क्षण येऊन गेले. अविस्मरणीय म्हणजे इतके की तो क्षणच ते दोघे खऱ्या अर्थानी 'जगले'. फार कमी जणांच्या आयुष्यात असे क्षण येतात की ज्या वेळी आपण To be one with God; देवाशी (का देवत्त्वाशी?) एकरूप होण्याची अनुभूती घेतो. माझ्या नशीबानी माझ्या आयुष्यात आत्तापर्यंतच असे क्षण दोनदा आले आहेत. त्यातला हा पहिला.
२३ डिसेंबर १९९७..... स.प. महाविद्यालयाच्या AKM च्या व्हॉलिबॉल कोर्टसवर रात्री ११ ला चौथी quarter finals call झाली. आमचा जिल्हा प्रशिक्षण केंद्र DCC - B विरुद्ध पुण्यातला सर्वोत्तम आणि सगळ्यांत अनुभवी संघ 'बँक ऑफ महाराष्ट्र'. आमची 'अ' संघ म्हणजे सीनियर खेळाडू आणि आम्ही 'ब' म्हणजे १९ वर्षांखालचे ! हाडापर्यंत पोचणारी थंडी... कितीही व्यायाम केला तरी 'वॉर्म-अप' होत नव्हता. Match पूर्वी दोन्ही संघ समोरासमोर उभे राहिलो तेव्हा लक्षात आलं की त्यांचे चार खेळाडू Senior nationals खेळलेले..... आणि दत्ता मोरे तर छत्रपती award winner! निकाल स्पष्ट होता..... 'जाधव सरांच्या पोरांना' बँकेचे खेळाडू किती मिनिटांत हरवतात हाच प्रश्न होता.... म्हणून उशीर झाला असून् सुद्धा दोन-तीनशे प्रेक्षक अजून ही सामना बघायला होते.
सुरुवातीला मी नेहेमीप्रमाणे zone 4 वरून सूरुवात केली. त्यांचे दत्ता मोरे चार नंबर ला होते. बघता बघता भाऊनी ५ पॉईंटस मिळवले. आमच्या सरांनी "टाईम आऊट" घेतला आणि मला म्हणाले तू counter attack सोडून center block ला खेळ.... भाऊना तू पकडायचं ! मी??? सव्वासहा फूट उंचीच्या छत्रपती ऍवॉर्ड विनरला मी ब्लॉक करायचं ? ठीकाय.... होऊन जाऊ द्या !!
पुन्हा मैदानात उतरलो.... आम्ही 'क्लीयर' केलेला बॉल त्यांनी भाऊंसाठी 'सेट' केला. १५ वर्षांचा अनुभव असलेले भाऊ त्या बॉल वर तुटून पडले...त्यांनी दात ओठ खाऊन जोरदार स्मॅश मारला..... इथे मी आणि सच्या मोरे दोघांनी जीवाच्या आकांतानी उडी मारली..... माझ्या दोन्ही हातांवर..त्या थंडीत.... मेणबत्ती विझेपर्यंत जोर घुमवणाऱ्या त्या हातांनी मारलेला तो सणसणीत स्मॅश एखाद्या तोफगोळ्यासारखा आदळला..... आणि......
....आणि दुसऱ्या क्षणी तो बॉल भाऊंच्या पायात पडलेला होता.... 'service change' ! भाऊ फक्त हसले. सच्या नि सर्व्हिस केली... पुन्हा सेटरनी मुद्दाम भाऊंना बॉल सेट केला...पुन्हा एक जोरदार स्मॅश... ह्यावेळी मी एकटाच ब्लॉक साठी उडी मारली.... आणि पुन्हा मी केलेला ब्लॉक त्यांच्या कोर्ट मध्ये पडला....टाळ्या, शिट्ट्यांनी मैदान दणाणून गेलं....आम्हाला आता जास्तंच चेव चढला होता. आमचा सेटर नीलेशनी मला बॉल सेट केला..... समोरच्यांना नक्की अपेक्षा असणार की मी तो जीव खाऊन मारणार. मग कशाला मारा ??? दोन ब्लॉकर्सच्या उंचावलेल्या हातांवरून अलगद बॉल 'प्लेस' केला....मागचे कोणीच ह्यासाठी तयार नव्हते... लगेच पुढचा बॉल अमित नि 'फिनिश' केला. 'जाधव सरांची पोरं' बँकेच्या कसलेल्या खेळाडूंना जेरीस आणत होती.
बँकेच्या खेळाडूंचा अनुभव शेवटी वरचढ ठरला..... पण आम्ही त्यांना पाच सेटपर्यंत जोरदार झुंज दिली. रात्री १ : ३० ला मॅच संपेपर्यंत एकही प्रेक्षक हलला नव्हता. प्रत्येक वेळी ब्लॉक करतांना... सगळी ताकद एकवटून स्मॅश मारताना... तो जल्लोष... प्रेक्षकांच्या टाळ्या ऐकताना... एक वेगळंच feeling येत होतं. लोकांच्या टाळ्या, शिट्ट्या..."come on तोश्या" च्या आरोळ्या... प्रत्येक वेळी ब्लॉक केल्यावर किंवा चकवून स्मॅश मारल्यावर भाऊंची होणारी चिडचिड...जणू आजूबाजूला काहीच नव्हतं... मी आणि माझा खेळ ! I saw my God ! इतकी वर्षं झाली...पण सगळा प्रसंग काल घडल्यासारखा आठवतो.. अजूनही त्या आठवणींनी अंगावर रोमांच उभे राहतात. पुन्हा ती विलक्षण अनुभूती मिळवण्यासाठी मी धडपडतोय.... एखाद्या प्रसंगाची 'किक' बसावी आणि एखादं व्यसन लागल्यासारखी ती पुनः पुन्हा हवीशी वाटावी तसं झालंय. मी वाटेल ते करायला तयार आहे ते क्षण पुन्हा जगायला !!!!

०८ फेब्रुवारी २००८

मी आणि माझी मराठी

अंतर्नाद वर हा पहिला लेख लिहीताना महाराष्ट्रात "मराठी विरुद्ध अमराठी" असा एक तथाकथित संघर्ष चालू आहे. तथाकथित अश्यासाठी, की सामान्य मराठी माणूस ह्या संघर्षात किती सामील आहे ह्याबद्दल शंका आहे.
मुळात "मराठी-अमराठी वाद"... आणि तो देखील मुंबईत निर्माण व्हावा अशी खरंच परिस्थिती आहे का? आम्ही का उत्तर प्रदेश आणि बिहार मधून आलेल्यांना असे वागवू? त्यांनी आमचा रोजगार बळकावला, किंवा ते आमची समाजव्यवस्था गढूळ करताहेत असे आरोप किती बिनबुडाचे आहेत ! हा कोण्या एक व्यक्तीचा राजकीय भयगंड आहे.
हा विचार करतानाच मनात विचार येतो मराठीच्या भवितव्याबद्दल होणाऱ्या चर्चेचा. ही मात्र नक्कीच काळजी करण्यासारखी बाब आहे. एक हजार पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असलेली माझी भाषा इतक्य सहज विलयाला जाऊ शकते? ज्या भाषेत ज्ञानेश्वरी लिहीली गेली, पंत, संत आणि तंत कवींपासून ते आमच्या बहिणाबाई, कुसुमाग्रज, विंदा, वसंत बापट, पु. ल, अगदी नव्या पिढीला नादवणाऱ्या संदीप खरेपर्यंत साहित्यिक आणि कवींनी ज्या भाषेत रचना केली, ती माझी मराठी काळाच्या पडद्याआड जाईल ? कोणतीही भाषा जिवंत ठेवायला आणि वाढवायला त्या भाषेतलं साहित्य आणि त्या भाषेची रुजलेली मुळं कारणीभूत असतात. आणि नेमका हाच विचार मनाला अस्वस्थ करतो.

आमची खरंच मुळं मराठीत रुजली आहेत? आणि आताच्या आईबापांची असली तरी पुढच्या पिढीचीदेखील मुळं मराठी मातीत रुजलेली असावीत ह्याची काळजी आमच्यापैकी किती जणं घेतात? एखादा बंगाली आपल्या मुलाला झोपवताना जितक्या आत्मीयतेने "भजो गोरांगो" म्हणतो, तितक्या जिव्हाळ्यानी आम्ही "गाई गोवर्धन, हिंडे गं बारा रान - तिला संगत गं छान, गोपाळांची ।" म्हणतो ? आम्ही जर आमच्या मुलांना "येरे येरे पावसा, तुला देतो पैसा" सोडून "Rain rain go away little Johnny wants to play" शिकवणार असू तर आमच्यासारखे करंटे आम्हीच. आजूबाजूला बंगाली, पंजाबी, तमीळ लोक राहात असोत वा मेक्सिकन, स्पॅनिश, जर्मन... आपली भाषा, आपली संस्कृती आपणच जपायला हवी.
आमच्या पोरांना पु. ल. वाचायला द्यायचे की जे.के रॉलिंग, लता मंगेशकर ऐकवायची की मडोना हे तर आम्हीच ठरवणार ना? आमच्या घरात डेलिया आणि कॅक्टस बरोबर एक तुळशीचं रोप जोपर्यंत आहे तोपर्यंत मराठीला काहीही होणार नाही. पण फक्त तेवढ रोप मात्र जपायला हवं.
- आशुतोष